डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा अग्नितांडव; फेज-२ मधील कंपनीत स्फोट, परिसरात धुराचे लोट, नागरिकांमध्ये घबराट
योगेश पांडे – वार्ताहर
डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीमध्ये दुसऱ्यांदा आगडोंब उसळला आहे. महिन्याभरातच एमआयडीसी दुसऱ्या आगीने हादरली आहे. या कंपनीतून धुराचा मोठा लोट दिसल्यामुळे परिसरातील नागरिकांचा काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला आहे. एकिकडे अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत,तर दुसरीकडे या परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली. यापूर्वी झालेल्या केमिकल कंपनीतील स्फोटात अनेकांनी जिवलगांना गमावले. तर अनेकजण अजूनही उपचार घेत आहे. डोंबिवलीकर स्फोटाच्या ढिगाऱ्यावर तर नाहीत ना, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मधील मालदे आणि इंडो अमाईन्स कंपनीत स्फोट झाल्यानंतर ही आग लागली. आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ठाणे आणि कल्याण अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचले. पाण्याचे टँकर देखिल तैनात करण्यात आले. युद्धपातळीवर आग विझविण्याचे कामाला शुरुआत झाली. कंपनीमध्ये काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरातून स्फोटाचे आवाज येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरातील अभिनव शाळेजवळ ही घटना घडल्याने शाळेच विद्यार्थी आणि येथील परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
कंपनीत स्फोट झाल्याने ही घटना घडली आहे. या कंपनीच्या शेजारील कंपनीतही आगीचे लोट पसरल्याचे समोर येत आहे. या स्फोटामुळे डोंबिवली परिसरात धुराचे लोट पसरले आहे. तर कंपनीतील कामगारांनी घटनास्थळावरुन पळ काढला तर परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. त्यांना तातडीने घरी पाठविण्यात आले आहे. तर या परिसरातील इतर कंपन्यांमधील कामगारांना पण बाहेर काढण्यात आले. या स्फोटामुळे कंपनीच्या बाहेरील वाहनांचे नुकसान झाले आहे. तातडीने हा परिसर मोकळा करण्यात आला आहे. धुराचे लोट सर्वदूर दिसत आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील आगीची दुर्घटना दुर्दैवी आहे. तातडीने या परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर हा परिसर मोकळा करण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर कार्यकर्ते लोकांना या परिसरातून बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे. वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने मुख्यमंत्री, एमआयडीसीचे अधिकारी आणि स्थानिक उद्योजकांमध्ये बैठक झाली होती. त्यात या कंपन्या बाहेर स्थलांतरीत करण्यासंबंधीच्या धोरणावर चर्चा झाली. त्यातच ही दुसरी आग लागली आहे. यासंबंधीच्या धोरणावर लवकरच अंमलबाजावणी होण्याविषयीची पावलं उचलण्यात येतील, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.