नागपूर पोलिसांनी अखेर उतरवला कुख्यात गुन्हेगार सीटू सिंहचा ‘रुबाब; भररस्त्यात धिंड काढत हात जोडलेल्या अवस्थेत ४ किलोमीटर फिरवलं
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – नागपूर शहरात दहशतीचं साम्राज्य उभं करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार सीटू सिंहचा ‘रुबाब’ अखेर पोलिसांनी रस्त्यावर उतरवत मोडून काढला. बुधवारी रात्री धडक कारवाई करत त्याची जाहीर धिंड काढली. या कारवाईद्वारे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचा ठोस संदेश देण्यात आला आहे. सीटू सिंहच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेत ही कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीटू सिंह याच्यावर खून, प्राणघातक हल्ला, खंडणी, बलात्कार, हाणामारी, शस्त्राच्या धाकावर वसुली आणि शिवीगाळ यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे अनेक दाखले आहेत. वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होत असल्याने त्याच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्याला अनेक वेळा समज देण्यात आली होती, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच होती. त्यामुळे थेट मैदानात उतरत पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवण्यासाठी सार्वजनिकरित्या ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास नागपूरमधील यशोधरा नगर परिसरातील कांजी हाऊस चौकातून सीटू सिंहची धिंड काढण्यात आली. हात दोरीने बांधून आणि हात जोडलेल्या अवस्थेत त्याला सुमारे चार किलोमीटर अंतर पायी फिरवण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरातील नागरिकांनी या कारवाईला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि अनेकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले.
या धिंडीमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, सुमारे चार किलोमीटरचा हा प्रवास सीटू सिंहसाठी ‘दहशतीतून अपमानाकडे’ असा ठरला. अशा कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. यापूर्वीही नागपूर शहर पोलीस दलाने कुख्यात गुन्हेगारांविरोधात अशाच प्रकारे कठोर भूमिका घेतली होती. काही गुंडांची सार्वजनिक धिंड काढून त्यांच्या दहशतीला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर सीटू सिंह विरोधातील ही कारवाईही त्याच धर्तीवर करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून शहरात गुन्हेगारीविरोधात आणखी कठोर धोरण राबवले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.