भांडुपमध्ये बेस्ट बस अपघातानंतर उपाययोजना; स्थानकापर्यंत रिक्षा नेल्यास दीड हजाराचा दंड
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर बेस्ट बस अपघातात चाैघांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने रस्ते मोकळे केले. फेरीवाल्यांवरही बडगा उगारला. परंतु, स्थानकाबाहेर पुन्हा रिक्षांची गर्दी वाढू लागली आहे. पश्चिमेला स्थानकापासून ठराविक अंतरावर सीमा रेषा आखली असून, त्यापुढे येणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिसांकडून दीड हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. स्थानकाबाहेर केलेल्या या उपाययोजनेमुळे वाहतूक कोंडीला काही प्रमाणात आळा बसला आहे. मात्र, बेस्ट बसचा धोकादायक वळणाचा प्रश्न अद्याप कायम आहे.
अपघातापूर्वी स्थानक परिसर पूर्णपणे फेरीवाल्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे अपघातानंतर प्रशासनाने कठोर कारवाई करत कुणालाही बसू दिले नाही. त्यामुळे रोज गर्दीतून वाट काढणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तरीही बस थेट प्रवाशांच्या रांगेजवळील फुटपाथवरून वळण घेताना आजही दिसते. परिणामी प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न कायम आहे.
फलाट क्रमांक १ वरील छताचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने अर्ध्या फलाटावर प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत आहे. काही प्रवासी आपल्याकडील छत्री किंवा शेडचा आधार घेताना दिसतात, तर काही जण उन्हापासून बचावासाठी जवळच्या छपराखाली थांबतात आणि ट्रेन येताच धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते.