पुण्यात वर्ल्ड कल्चर फेस्टीव्हलमध्ये नाचवल्या तलवारी अन् बांगलादेशी झेंडे; भाजप युवा मोर्चाकडून कार्यक्रमावर आक्षेप
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील कोथरूड भागात असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात वर्ल्ड कल्चरल फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विविध शाखेत शिकणाऱ्या अनेक परदेशी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात विविध देशातील विद्यार्थी जे या महाविद्यालयात शिक्षण घेतात त्यांनी त्यांचा कला आणि संस्कृतीचे सादरीकरण केलं,या कार्यक्रमात सुदान देशाच्या विद्यार्थ्यांनी एका संगीताच्या आधारे त्यांच्या देशातील लोककलेचे सादरीकरण केलं. यावेळी सादरीकरणात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी हातात तलवारी घेऊन नृत्य केलं. व्हिडिओमध्ये दिसते त्यानुसार, नृत्य करत असलेल्या एका तरुणाने तर चक्क तलवार त्याच्या तोंडात धरली होती. दुसऱ्या बाजूला, याच कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी बांगलादेशचे झेंडे लावत एक फूड स्टॉल सुद्धा लावला होता. स्थानिक विद्यार्थ्यांनी या स्टॉल बाबत एक पत्र महाविद्यालयाच्या प्रशासनाला पाठवलं होते.
स्थानिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या पत्रानुसार सध्या बांगलादेशकडून भारत व भारतीय हितसंबंधांविरोधात शत्रुत्वपूर्ण कारवाया आणि अत्याचार होत असल्याच्या बातम्यांमुळे देशभरात जनतेमध्ये तीव्र चिंता व्यक्त होताना दिसतात. अशा संवेदनशील परिस्थितीत, विद्यापीठ स्तरावरील सांस्कृतिक कार्यक्रमात बांगलादेशचा स्टॉल असणे राष्ट्रीय एकात्मता व सुरक्षेशी जोडलेली भावना असलेल्या विद्यार्थी व इतर संबंधित घटकांच्या भावना दुखावू शकते, यामुळे बांगलादेशच्या स्टॉल लावण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्र देऊन सुद्धा बांगलादेशच्या विद्यार्थ्यांनी तिथे स्टॉल लावला. ही बाब भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना कळल्यानंतर त्यांनी तिथे जाऊन संबंधित फूड स्टॉल उधळून कॉलेज प्रशासनाचा निषेध व्यक्त केला, तसेच बांगलादेश देशाचा झेंड्याचा फोटो जाळत घोषणाबाजी केली. याप्रकरणी भाजप युवा मोर्चाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
ग्लोबल कल्चरल फेस्टिव्हल’च्या माध्यमातून विविध देशांतील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देताना, राष्ट्रहित आणि सामाजिक संवेदनशीलता यांचा पुरेपूर विचार व्हावा, असे भाजयुमोने निवेदनात नमूद केले आहे. देशाच्या सध्याच्या सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीच्या अनुषंगाने शैक्षणिक संस्थांनी जबाबदारीने भूमिका घ्यावी, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे. भाजयुमोचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ म्हणाले की, “शैक्षणिक संस्था या राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन करणाऱ्या केंद्रस्थानी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक भावना जपल्या जाव्यात आणि कोणताही निर्णय घेताना व्यापक सामाजिक परिणामांचा विचार व्हावा. आम्ही प्रशासनाकडून सकारात्मक आणि स्पष्ट प्रतिसादाची अपेक्षा करीत आहोत.”