प्रेमाच्या बहाण्याने जाळ्यात ओढून निर्घृण लूट करणाऱ्या हनिट्रॅप टोळीचा पर्दाफाश; दोन तरुणींसह पाच जणांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – प्रेमाच्या बहाण्याने जाळ्यात ओढून निर्घृण लूट करणाऱ्या हनिट्रॅप टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठा पर्दाफाश केला आहे. दोन तरुणींसह पाच जणांना अटक करण्यात आली असून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गोड बोलणं, थेट बारदरीत सापळा प्रेमाचा बहाणा करत तरुणीने फोनवरून फिर्यादीला गाठले. तिच्या बोलण्याला भुलून फिर्यादी थेट बारदरी (गर्भगिरी फाटा) येथे भेटीसाठी पोहोचला. मात्र तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी गळ्याला कोयता लावून सोने-चांदीचे दागिने व रोकड लुटली. बदनामीच्या भीतीने फिर्यादीने सुरुवातीला रस्ता लुटीची तक्रार दिली. मात्र, याच तक्रारीचा तपास करत असताना एलसीबीच्या पोलिसांना हा संपूर्ण हनिट्रॅपचा कट उघडकीस आला.
गंभीर स्वरूपाचा गुन्हा लक्षात घेता, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपोवन रोड येथे सापळा रचून मुख्य आरोपी शुभम बडे याला अटक केली. चौकशीत त्याने दोन तरुणी व अन्य साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
अटक केलेले आरोपी शुभम शहादेव बडे,सोहेल पापाभाई सय्यद,अशपाक नासिर पठाण,वैष्णवी राजेंद्र उनवने आणि रुपाली गजानन बनकर चोरीचे दागिने खरेदी करणारा सराफ सुरज प्रदीप शहाणे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरीचे दागिने सराफाकडे विक्री चौकशीत आरोपींनी लुटलेले दागिने सराफाला विकल्याचे उघड झाले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या सराफाने पोलिसी खाक्या दाखवताच मुद्देमाल काढून दिला.
हनिट्रॅपद्वारे लूट केल्यानंतर आरोपी थेट गोवा ट्रिपला गेले. समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करून नगरमध्ये परतताच एलसीबीच्या पथकाने झडप घालून सर्वांच्या मुसक्या आवळल्या. सराईत गुन्हेगारांचा सहभाग मुख्य आरोपी शुभम बडे याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अशपाक पठाण याच्यावर भिंगार पोलिस ठाण्यात दोन गुन्हे नोंद आहेत. अनेकांना गंडवल्याचा संशय आरोपींनी यापूर्वीही पाच ते सहा जणांना अशाच पद्धतीने गंडवल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. इज्जतीच्या भीतीने अनेकांनी तक्रार दिली नसावी, असा संशय आहे.