जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा प्रचार न करण्याचा निर्णय; अजित पवारांच्या निधनामुळे सर्व सभा रद्द
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. स्थानिक नेते, पदाधिकारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचार करतील. देवेंद्र फडणवीस कोणताही प्रचार करणार नाही.
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याआधी ५ फेब्रुवारीपर्यंत प्रचारासाठी वेळ देण्यात आली आहे. यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या ७ दिवसांत २२ प्रचारसभा होणार होत्या. एकही सभा न घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे देवेंद्र फडणवीसांनी सर्व सभा रद्द केल्या आहेत.
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवार रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी रोजी होणार असून आहे. तर मतमोजणीची तारीखही बदलून ९ फेब्रुवारी करण्यात आली आहे.
अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. २८ जानेवारीला अजित पवार खाजगी विमानानेसकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली.लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत २९ जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.