जुन्या वादाचा राग; मित्रांनीच काढला मित्राचा काटा केला, अपघाताचा बनाव
पोलीस महानगर नेटवर्क
धाराशिवच्या परांडा तालुक्यातील प्रकार; दोघे संशयित ताब्यात
धाराशिव : परांडा तालुक्यातील कंडारी–सोनारी रस्त्यावर घडलेला संशयास्पद अपघात नसून, तो पूर्ववैमनस्यातून केलेला खून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जुन्या भांडणाच्या रागातून दोन मित्रांनी मिळून ३५ वर्षीय मित्राच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्याचा खून केल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी आंबी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मयत मोतीराम जाधव हे सोमवारी रात्री कुटुंबासह जेवण करत असताना त्यांचे मित्र विष्णु कालीदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे हे मोटारसायकलवरून त्यांच्या घरी आले. पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी असल्याचे सांगून त्यांनी मोतीराम यांना सोबत नेले. मात्र, रात्री दहाच्या सुमारास विष्णु तिंबोळे हा एकटाच मोतीराम यांच्या घरी परतला आणि कंडारी–सोनारी रस्त्यावर अपघात झाल्याची माहिती दिली.
त्यानंतर मयताची पत्नी सोनाली जाधव व आई रतन यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मोतीराम हे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच घटनास्थळी काही ठिकाणी रक्तावर पाणी व माती टाकल्याचे दिसून आल्याने अपघाताबाबत संशय बळावला.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, मोतीराम जाधव व आरोपी मित्रांमध्ये पूर्वी भांडण झाले होते. त्या वादातूनच दोघांनी मिळून मोतीराम यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून खून केला आणि अपघाताचा बनाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच आंबी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यात हा अपघात नसून घातपात असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी व जवळील पत्र्याच्या शेडमध्ये रक्ताचे डाग आढळून आले असून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
या प्रकरणी आंबी पोलिसांनी दोन्ही संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.