कार्तिकी वारीतील वारकऱ्यांवर काळाचा घाला; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
उरण – कार्तिकी एकादशीच्या पवित्र वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा मंगळवारी सकाळी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत घाटात भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत दोन वारकरी जागीच ठार झाले, तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
उरण येथील श्री दावजी पाटील यांची दिंडी आळंदीच्या वारीसाठी जात असताना मंगळवारी ११ नोव्हेंबर सकाळी सुमारे ६:३० वाजताच्या सुमारास वरच्या बाजूने उतरत असलेल्या एका भरधाव कंटेनरचा ताबा सुटला आणि तो थेट वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. या धडकेत दोन वारकरी जागीच मृत्युमुखी पडले. तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
मागील तीन वर्षांपूर्वी याच मार्गावर बोलेरो दिंडीत घुसल्याने अपघात झाला होता. त्यावेळी वारकऱ्यांनी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. काही दिवस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली, पण नंतर पुन्हा वारकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रशासन बेफिकिर असल्याचं म्हटलं जात आहे. वारकऱ्यांच्या जीवाचा विचार न करणारी निष्काळजी व्यवस्था असा संतप्त सूर आता उमटत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.