मी गरज असल्याल हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही – प्रताप सरनाईक
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या नव्या वक्तव्यामुळे आता पुन्हा राजकीय वाद
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी-मराठी वाद पुन्हा शिगेला पेटण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. भाषेनिहाय प्रांतरचना झाली. त्यानुसार महाराष्ट्रात मराठी ही राज्य भाषा आहे. पण महाराष्ट्राच्या मुंबईतच मराठी भाषेला कमी लेखण्याचा किंवा मुंबईत मराठी सक्तीची नाही, असा मेसेज देणारे वक्तव्य सातत्याने समोर आले आहेत. प्रताप सरनाईक यांनी काही महिन्यांपूर्वी हिंदी भाषा ही मुंबईची बोलीभाषा झालीय, असं वक्तव्य करत वाद ओढवून घेतला होता. यानंतर त्यांना प्रतिकारही सोसावा लागला होता. मीरा रोड येथे निघालेल्या मराठी मोर्चात प्रताप सरनाईक यांच्या दिशेला आंदोलकांनी बॉटल भिरकावली होती. यानंतर आता प्रताप सरनाईक यांच नवं वक्तव्य समोर आलं आहे.
मी गरज असल्याल हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही”, असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. अर्थात महाराष्ट्रात मराठी बोलणं आवश्यक आहे. मराठी बोलता येत नसेल तर ती भाषा शिकणं आवश्यक आहे. मराठी बोलण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण आता मंत्रीच उघडपणे गरज असल्यास हिंदीत बोलतो, आपल्याला फरक पडत नाही, असं वक्तव्य करताना दिसत आहेत. अर्थात गरज पडल्यास हिंदी सर्वांनाच बोलावी लागते. पण अशा वक्तव्यातून सरनाईक यांना हिंदी भाषिकांना खूश करण्याचा प्रयत्न राजकारणात अंगलटी येऊ शकतो. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“हे विविध जाती, धर्माच्या नागरिकांचं शहर आहे. मी आयुक्तांना म्हटलं होतं की, तुम्ही काळजी करु नका. मराठी-हिंदी वाद जो असेल तो असेल. पण तुम्ही हिंदीमध्ये बोललात तरी चालेल आणि लोकांना सुद्धा कळेल. मी सुद्धा भले मराठी आमदार असेन तरी मी माझ्या सर्वसामान्य जनतेबरोबर ज्या ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेस हिंदीत बोलेन. मला फरक पडत नाही”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
ही कुठली आगतिकता? म्हणजे मराठीची गळचेपी झाली तरी चालेल. ठिक आहे, त्या ज्या कुणी आयएएस अधिकारी असतील, त्यांना येत नसेल. येत नसेल तर शिका. बोलण्याचा प्रयत्न करा. हे काय सांगतात तर चालेल? म्हणजे तुम्ही चारही बाजूंनी ढोल वाजवायची पद्धत आहे. मराठीची गळचेपी झाली तरी चालेल. हिंदी भाषिकांना खूश करण्यासाठी काहीही करु”, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.