विरारमधील थरारक घटना, फेरीबोट समुद्रात फसली; शेकडो प्रवासी अडकले
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – विरार येथील समुद्रात फेरीबोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. सफाळ्याच्या जालसार येथून निघालेल्या रो रो सेवेची बोट विरारच्या नारींगी येथील जेट्टीजवळ समुद्रात अडकली होती. जेट्टीच्या रॅम्पचा हायड्रोलिक पंप तुटल्याने बोट किनाऱ्यावर जवळपास दीड तास अडकून पडली होती. विरारच्या समुद्र किनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता सफाळ्याच्या जालसार येथून फेरीबोट निघाली होती. बोट प्रवाशांनी खच्चून भरली होती, विराच्या नारिंगी जेट्टीजवळ ही बोट थांबणार होती. मात्र, येथे बोट अडकल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली, काही प्रवासी भयभीतही झाल होते.
रँप हा एक उतार असलेला धातूचा किंवा मिश्र संरचनेचा प्लेटफॉर्म असतो, जो घाट जेट्टी आणि फेरीबोटच्या डेक यांना जोडतो. त्यावरून वाहनं फेरीवर चढतात आणि उतरतात. फेरी बोट जेट्टीवर आली की रॅम्प उचलला जातो. मात्र, रॅम्पला असलेला हायड्रोलिक पाईप अचानक तुटला. त्यामुळे प्रवासी बोटीत खोळंबले. या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बोट जेट्टीवर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, या रो रो बोटीवरील कर्मचारी यांना कोणतेही आपत्कालीन परिस्थितीत प्रशिक्षण दिलं नसल्यामुळे त्यांना काही करता आलं नाही. सायकलच्या टायर ट्यूबने फुटलेला पाईप बांधून त्यांचे केविलवाणी प्रयत्न सुरू होते, असे बोटीतील प्रवाशांनी सांगितले.
येथील जेट्टीवर आपतकालीन व्यवस्थेचा अभाव असल्याचे फेरी बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले. कर्मचाऱ्यांचे वर्तनही उर्मटपणाचे असल्याचे ते म्हणाले. याच दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे लहान मुले व वृद्ध यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. जवळपास दीड तासानंतर भरतीचे पाणी वाढल्यानंतर दोर बांधून रॅम सुरक्षित जेट्टीवरती लावून वाहने उतरवण्यात आली. या दरम्यान, समुद्राच्या आतमध्ये प्रियंका नावाची दुसरी रो रो बोट जलसारी येथे पाठविण्यात आली होती. त्यातून, फेरी बोटीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे, बोटीतील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. मात्र, संध्याकाळच्या वेळेस फेरी बोट अडकल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. अखेर, सुटकेनंतर सर्वांनी मोकळा श्वास घेतला.