शाळकरी मुलाचे अपहरण अन् हत्या; शेजाऱ्यानेच रचला कट; पोलिसांकडून तिघांना बेड्या

Spread the love

शाळकरी मुलाचे अपहरण अन् हत्या; शेजाऱ्यानेच रचला कट; पोलिसांकडून तिघांना बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर – जिल्ह्यातील खापरखेडा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या अपहरण अन् हत्याप्रकरणाने नागपूर हादरलं आहे. जितू युवराज सोनेकर (११) मुलांचं नाव असून जितू हा खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. आरोपींनी ११ वर्षीय जितूचे शाळेतून सुटल्यानंतर अपहरण करुन हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. जितू हा १५ सप्टेंबर रोजी शाळेसाठी घरुन गेला होता. मात्र, शाळा सुटल्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्यामुळे, कुटुंबीयांनी शाळेत धाव घेत विचारपूस केली, त्याच्या मित्रांनाही विचारले. त्यावेळी, जितूला एका कारमध्ये बसल्याचे पाहिल्याचं मित्रांनी सांगितलं. त्यानंतर, कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली. मात्र, पोलिसानी शोध घेतला तरीही जितूचा थांगपत्ता लागलाच नाही. अखेर बुधवारी चनकापूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनीलगतच्या शिवारात गुराख्याला लहान मुलांचा शाळेच्या गणवेश घातलेलामृतदेह झुडपात दिसून आला. त्यानंतर, या गुराख्याने पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यामुळे, पोलिसांनी घटनेचा तपास करत काही तासांतच आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी अपहरण करुन निर्घृण हत्या करणाऱ्या तिन्ही नराधमास अटक केली आहे. आरोपींनी खंडणीसाठी या चिमुकल्या शाळकरी मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याची कबुली दिली.

जीतूचे वडील यांना शेत विकल्याचे पैसे मिळणार असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या आरोपीला होती. त्यामुळे, आरोपी राहुल पाल, अरुण भारती आणि यश वर्मा यांनी पैसे कमावण्याच्या हेतूने जितूच्या अपहरणाचा कट रचला होता. जितूचे अपहरण करुन त्याच्या वडिलांकडे खंडणी मागण्याचा तयारीत आरोपी होते. मात्र, अपहरण केल्यानंतर जितूने विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यामुळे, घाबरलेल्या आरोपीने चिमुकल्या मुलाची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर, दोन दिवस त्याचा मृतदेह लपवून ठेवत प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कसून तपास सुरू केल्यानंतर अखेर आरोपीचे बिंग फुटले. केवळ पैशाच्या लोभापायी तिघांनी लहानग्या शाळकरी मुलाचा जीव घेतल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon