कल्याणमधील वसंत व्हॅली प्रसुतीगृहात एका दिवसाच्या बाळाचा मृत्यू; हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणाचा कुटुबीयांचा आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणमध्ये केडीएमसीच्या वसंत व्हॅली प्रसुतीगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. केवळ एक दिवसाच्या बालिकेचा मृत्यू झाला असून डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडला असून, तीन दिवसाचा ऑक्सिजन देणार असल्याचं सांगत एकही दिवस न दिल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय. या प्रकरणानंतर संतप्त नातेवाईक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला त्याचबरोबर संबंधित डॉक्टर व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी इशारा देखील दिला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनानं आपला निष्काळजीपणा नसल्याचं सांगत ‘बाळाला दूध पाजल्यानंतर ढेकर न आल्यानं मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करत बालिकेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे, त्यानंतर सत्य बाहेर येईल,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळाच्या मृत्यूनंतर बाळाचे वडील अजरुद्दीन मनसुरी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून त्यांनी कल्याण डोबिंवली महानगरपालिका प्रशासनाशी या घटनेसंदर्भात संपर्क केलाय. दरम्यान, बाळाचा पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असं स्पष्टीकरण आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिलं आहे.