मोबाईल चोरी व गहाळ प्रकरणांवर परिमंडळ ४ ची मोठी कारवाई; ३४७ मोबाईल हस्तगत, ५६ लाखांची मालमत्ता तक्रारदारांना परत
मुंबई – मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ४ अंतर्गत चोरी व गहाळ मोबाईल शोधण्यासाठी १५ दिवसांची विशेष मोहीम यशस्वीपणे पार पडली. दिनांक २० जुलै २०२५ ते ५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेद्वारे एकूण ३४७ मोबाईल हँडसेट्स हस्तगत करण्यात आले असून त्यांची एकूण अंदाजित किंमत ५६,३०,८९५/- रुपये इतकी आहे. या मोहिमेअंतर्गत परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. २०२२ ते २०२५ या कालावधीत चोरी किंवा गहाळ झालेल्या मोबाईल फोनची यादी तयार करून, तांत्रिक विश्लेषण व ट्रॅकिंगच्या माध्यमातून शोधमोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही पथके पाठवून मोबाईल्स जप्त करण्यात आले.
हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल्समध्ये
२०२२ मधील – ४८ मोबाईल
२०२३ मधील – ३४ मोबाईल
२०२४ मधील – ९६ मोबाईल
२०२५ मधील – १६९ मोबाईल
यांचा समावेश आहे.
६ ऑगस्ट २०२५ रोजी सायन (पूर्व) येथील नॉर्थ इंडियन असोसिएशनमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात तक्रारदारांना त्यांचे मोबाईल फोन अधिकृतरित्या परत करण्यात आले. ही संपूर्ण मोहीम मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (का. व सु.) श्री. सत्यनारायण, आणि अप्पर पोलीस आयुक्त श्री. विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ४) श्रीमती रागसुधा आर. यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे राबविण्यात आली. परिमंडळ ४ च्या या यशस्वी कारवाईमुळे तक्रारदारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.