पाकिस्तानविरुद्ध लढताना महाराष्ट्राच्या लेकाचं बलिदान; मुंबईतील मुरली नाईक यांना वीरगती !
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – पेहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणे उद्धस्त केली. यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमारेषेजवळील गावांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे २ जवान शहीद झाले आहेत. यातील मुरली नाईक हे मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी होते. ते मूळचे आंध्र प्रदेशचे होते. शहीद जवान मुरली नाईक यांना २ मे २०२५ रोजी पाकिस्तानशी लढताना वीरगती प्राप्त झाली. यानंतर संपूर्ण शहरावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तसेच देशभरातून हळहळ व्यक्त केली जातेय.
पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांनाही वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. मुरली नाईक यांना वीरगती प्राप्त झाली. यानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद मुरली नाईक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने ७ मे च्या रात्री पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले. खरतर हा हल्ला पाकिस्तानी सैनिक अथवा पाकिस्तानी नागरिकांवर नव्हता. तरीदेखील पाकिस्तानने हा हल्ला इगोवर घेतला आणि भारताच्या सिमेलगत गावांवर हल्ले चढवले. यानंतर भारताकडूनही त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले.