पुण्यातील वरंध घाटात सापडला शीर नसलेला मृतदेह, हात-पायही बांधलेले, खून झाल्याचा संशय
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातल्या भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटात एक खळबळजनक घटना घडली आहे. शिरगांव गावच्या हद्दीत स्थानिकांना एका अज्ञात व्यक्तीचा शिर कापलेला मृतदेह सापडला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. शिरगांवच्या दुर्गम डोंगराळ भागात हा मृतदेह हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक तपासात खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगांव परिसरातील काही स्थानिक लोक आपल्या जनावरांना चरण्यासाठी डोंगराळ भागात घेऊन गेले होते. तिथं त्यांना घाणेरडा वास येत होता. संशय आल्यानं त्यांनी आजूबाजूला पाहणी केली. तेव्हा तिथं त्यांना एका निर्जन ठिकाणी हात-पाय बांधलेला आणि शिरच्छेद केलेला मृतदेह आढळला. हे सगळं पाहून गुरं चारणाऱ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. त्यांनी तातडीनं भोर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाला पुढील तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसंच जवळच्या गावांमध्ये चौकशी सुरू केली आहे. मृतदेहाचं शीर नसल्यानं आणि हात-पाय बांधलेले असल्यानं हा सुनियोजित खून असल्याचा पोलिसांचा संशय आहे. भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर डोकं शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. मात्र, अद्याप डोकं सापडलेले नाही. वरंध घाट हा दुर्गम आणि कमी वर्दळीचा मार्ग असल्यानं अशा गुन्ह्यांना आळा घालणं आव्हानात्मक आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.