मालाड परिसरात कर्करोगाच्या आजारपणाला कंटाळून अंगाला दगड बांधून व्यक्तीची आत्महत्या
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबईतील मालाड परिसरातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका व्यक्तीने गुरुवारी सकाळी शांताराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती कर्करोगाचा रुग्ण होता आणि आजारपणाला वैतागून त्याने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल माने (५२) असे तलावात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या मयत व्यक्तीचे नाव आहे. अनिल हे मालाड पूर्व येथील हवाहिरा पार्कमधील अथर्व सोसायटीत वास्तव्यास होते. दरम्यान, अनिल माने यांनी गुरुवारी सकाळी ७.४० मिनिटांनी शांताराम तलावात उडी घेतली. तलावात उडी घेण्यापूर्वी एका व्यक्तीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अपयशी ठरले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अनिल यांचा मृतदेह पाण्यात बाहेर काढला. पाण्यात उडी मारण्यापूर्वी अनिल यांनी स्वतःच्या अंगाला दगड बांधल्याचे दिसून आले. पोलीस आणि अग्निशमन दलाने त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रियेसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. अनिल यांना कर्करोग होता आणि आजारपणाला वैतागून त्यांनी असे टोकाचे पाऊस उचलले. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.