शाब्बास ! मुंबई रेल्वे पोलीस, मुंबईवरुन अपहरण झालेल्या सहा वर्षीय बालकाची शेगावमधून सुटका
योगेश पांडे / वार्ताहर
बुलढाणा – मुंबईतील पायधुनी पोलीस स्टेशन हद्दीत एका सहा वर्षीय बालकाचे अपहरण झाल होत. २६ मे २०२४ रोजी ही घटना घडली असून मोहम्मद आसिफ असे या अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना उजेडात येताच मोहम्मद आसिफ याच्या कुटुंबीयांनी याबाबत पायधूनी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, अखेर मुंबईवरुन अपहरण झालेल्या या बालकाची शेगाव येथे सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे एका बालकांचे सुखरूप सुटका झाल्याने या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. मात्र यातील अपहरणकर्ते नेमकं कोण? हे अद्याप कळू शकलेले नाही. परिणामी, सध्या पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. ६ वर्षीय मोहम्मद आसिफ अचानक गायब झाल्याच्या घटणेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मोहम्मद आसिफच्या कुटुंबीयांनी मुंबईतील पायधुनी पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती पोलिसांना देत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र गतिमान करत या बालकाचा शोध सुरू केला. त्यानंतर एक बालक कोलकाताकडे जाणाऱ्या ट्रेन नं १२८६९ मध्ये असल्याचं पोलिसांना समजले. ही माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तात्काळ कोलकाताकडे जाणाऱ्या सर्व स्टेशन्सला याबाबत सूचना दिल्या.
या सूचनेनुसार शेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी गुप्तहेर पाठवून अपहरण झालेलं बालक एस ७ कोच मध्ये बसलेला असल्याचं माहीत दिली. त्यानंतर ही ट्रेन शेगावला येताच या बालकाला रेस्क्यू केलं आणि त्याची माहिती मुंबई पोलिसांना कळविण्यात आली. त्यावरून काल त्या बालकाला विधिवत कार्यवाही पूर्ण करून मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या सहा वर्षीय चिमुकला दूसरा तिसरा कुणी नसून मोहम्मद आसिफच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे अपहरणकर्त्याच्या तावडीतून या बालकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.परिणामी, पोलिसांच्या या कामगिरीने पुन्हा आरपीएफ विभागाचे नाव उंचावले आहे.