बदलापूरला येणाऱ्या लोकल रेल्वेचे दरवाजा बंद करणाऱ्या ५ महिलांवर गुन्हे दाखल
बदलापूर (प्रतिनिधी) – दिवसेंदिवस वाढणारी रेल्वे प्रवाशांची संख्या त्यात अपुऱ्या पडणाऱ्या लोकल ट्रेन यामुळे प्रवाशांमध्ये सतत होणारे वादविवाद व त्यातून होणाऱ्या हाणामाऱ्या हा जणू नित्याचाच भाग बनला आहे. मध्य रेल्वेवरील लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात, पण प्रवाशांच्या तुलनेत रेल्वे लोकल कमी असल्याने जीवघेणा प्रवास करावा लागतो यामध्ये दरवर्षी हजारो प्रवासी आपला जीव गमावतात तर काही कायमचे जायबंदी होतात. सुखकर प्रवासाच्या वलग्ना व उद्घोषणा करणारे रेल्वे प्रशासन व राज्यकर्ते वांझोटे बनले आहे.
दोन दिवसांपूर्वी कर्जत वरून मुंबई ला येणाऱ्या लोकलमधील काही महिलांनी बदलापूर रेल्वे स्थानक येताच लोकल रेल्वेचे दरवाजा बंद करून घेतले, त्यामुळे बदलापूर स्थानकामधून प्रवास करणाऱ्या महिलांना ट्रेनमध्ये चढता आले नाही. थोडयाफार अशाच पद्धतीने लोकल मधील प्रवासी दरवाजा अडवून अन्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश देत नाहीत. प्रवाशांची संख्या वाढत असताना लोकल रेल्वेची संख्या मात्र आहे त्याच स्थितीत आहे, त्यासाठी रेल्वे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही,अनेक वेळा रेल्वे दरबारी पत्रव्यवहार करून देखील गेंड्याच्या कातडीप्रमाणे कोणतीच ठोस उपाययोजना करीत नसल्याचा आरोप पुणे-मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे सचिव प्रकाश संकपाळ यांनी केला आहे.
प्रवाशांच्या उद्रेकामुळे असे अनेक प्रकार रेल्वे प्रवासादरम्यान होत असतात, तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाने महिलांवर गुन्हे दाखल करणे योग्य नसल्याचे अनेक प्रवाशांनी दैनिक पोलीस महानगर शी बोलताना सांगितले.