भिवंडीत किरकोळ भांडणातून दिरांकडून वहिनीच्या मावस भावाची हत्या; शांतीनगर पोलिसांनी तिघांना केली अटक
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – मावस बहीण आणि तिच्या पतीच्या भांडणात नातेवाईक मावस भावाने मध्यस्थी केली. या रागातून पतीच्या तीन भावांनी आपसात संगनमताने मध्यस्थी करणाऱ्या चुलत भावाला लोखंडी सुऱ्याने भोसकून जीवे ठार मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना भिवंडीतील शांतीनगर येथील न्यू आझाद नगर मधील निजामिया हॉटेलजवळ घडली असून या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक पोलिसांनी दिली आहे. दिलशाद मकबूल अहमद शहा (२३) असे मृतकाचे नाव आहे. तर या हत्येप्रकरणी आसीफ अब्दुलहकीम शहा, अलीहसन अब्दुलहकीम शहा, मुझफ्फर अब्दुलहकीम शहा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भावांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुलजार मकबूल अहमद शहा (२५) याचा कपडा विक्रीचा व्यवसाय असून मयत दिलशाद आणि गुलजार हे दोघे सख्खे भाऊ आहेत. दरम्यान, गुलजार ने त्याच्या मावस बहीण व तिच्या पतीमध्ये २५ जानेवारी रोजी झालेल्या भांडणात मध्यस्थी करून भांडण सोडवले होते. त्यामुळे या तिघा आरोपींनी आपसात संगनमताने गुलजारने भांडण सोडवल्याचा राग मनात धरून याचा काटा गुलजारचा भाऊ दिलशादवर काढून आसिफने त्याच्याकडील सुऱ्याने भोसकून दिलशादची निर्घुण हत्या केल्याचं तक्रारदार गुलजारने फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, दिलशाद यास मारहाण होत असतानाच गुलजार हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्यालाही मुझफ्फरने लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दिलशाद यास उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले असून त्याचा मृतदेह शवविच्छेदना करिता पाठवण्यात आला आहे. त्यानंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दाखल होत हत्येतील नमुने जमा करून तपास सुरू केला आहे. या हत्येप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी तिघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे.