पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य; हरवलेले २०० मोबाईल तक्रारदारांना परत
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुंबई पोलिसांकडून हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल फोन मूळ तक्रारदारांना परत देण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून काढलेले एकूण २०० मोबाईल फोन संबंधित नागरिकांना परत करण्यात आले.
या कार्यक्रमाला मा. डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉ. मोहितकुमार गर्ग, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०२, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ ०२ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांचे सायबर अधिकारी, गुन्हे प्रकटीकरण पथक आणि झोनल सायबर लॅब यांनी संयुक्तपणे केलेल्या अथक प्रयत्नांतून हे मोबाईल फोन शोधून काढण्यात आले.
तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून शोधण्यात आलेल्या या २०० मोबाईल फोनची अंदाजे किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मोबाईल फोन परत मिळाल्यानंतर उपस्थित तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि तत्पर सेवेबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या तक्रारींच्या प्रभावी निवारणासाठी मुंबई पोलीस सदैव कटिबद्ध असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह सेवा देण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले.