“जिल्ह्याच्या विकासासाठी एक फुटकी कवडीही मिळाली नाही”; आमदार किशोर पाटील यांचा महायुतीवर घणाघात
योगेश पांडे / वार्ताहर
पाचोरा – शिवसेना (शिंदे गट) निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत घरचा आहेर दिला. “गेल्या वर्षभरात विकासकामांसाठी एक फुटकी कवडीसुद्धा मिळालेली नाही,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
भाजपवर थेट निशाणा साधताना पाटील म्हणाले, “बंडखोरांना पक्षात घेतलं जातं, त्यांना पदं दिली जातात, पण निष्ठावंत आमदारांना निधीही मिळत नाही.” जिल्हा नियोजन निधीपैकी ५० टक्के हिस्सा आपल्या मतदारसंघाला द्यावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारला सुनावलं. “एक रुपयात पिक विमा योजना सुरू राहिली असती, तर शेतकऱ्याला शासनाकडे हात पसरवावा लागला नसता,” असे ते म्हणाले.
तसेच शेतकरी आंदोलनाबाबत बच्चू कडू यांचे कौतुक करत, “आता तारखा न देता तात्काळ कर्जमाफी जाहीर करा,” अशी मागणी त्यांनी केली.
याउलट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे पाटील यांनी कौतुक केले. “शिंदे यांनी एका दिवसाच्या नायकासारखं काम केलं. त्यांनी सुरू केलेलं ‘लाडक्या भगिनींना’ मानधन हे खूप मोलाचं आहे,” असे ते म्हणाले.
या भाषणामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत.