ठाण्यात तक्रार निवारण दिन; १४३८ अर्जांवर पोलीसांची जलद कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. दिनांक २७ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या या उपक्रमात तब्बल १४३८ अर्जदारांना बोलाविण्यात आले होते, त्यापैकी ९८१ अर्जदार प्रत्यक्ष हजर राहिले.
या कार्यक्रमात ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते. तक्रार निवारण दिनादरम्यान ८५२ अर्जांची तात्काळ सोडवणूक अर्जदारांच्या समक्षच करण्यात आली, तर उर्वरित तक्रारींचे निराकरण लवकरच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अर्जदारांना प्रत्यक्ष बोलावून जागच्या जागी तक्रारींचे निरसन केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ठाणे शहर पोलीसांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी सांगितले की, “तक्रार निवारण दिनामुळे नागरिकांचा विश्वास वाढला असून पोलिस-नागरिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.”