मुंबईची लाईफलाईन थाबंली! ठाणे-सीएसएमटी वाहतूक ठप्प; हार्बर सेवाही कोलमडली
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आली. मात्र, ठाणे – कर्जत, खोपोली आणि कसारा स्थानकादरम्यान शटल सेवा सुरू राहिल्या.
हार्बर मार्गावरील चुन्नाभट्टी स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले त्यामुळे कुर्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. या परिस्थितीमुळे मुंबईतील रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.