क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप कामगाराचा मृत्यु; क्रेन चालकावर गुन्हा दाखल
योगेश पांडे/वार्ताहर
उल्हासनगर – उल्हासनगरच्या म्हारळ गावातील एमआयडीसीच्या शहाड जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक काम सुरू असताना क्रेन चालकाच्या चुकीने एक कामगार कोसळून पाण्याच्या टाकीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ होत असून क्रेन चालकावर गुन्हा नोंद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या म्हारळ गावात एमआयडीसीचं जलशुद्धीकरण केंद्र आहे. या जलशुद्धीकरण केंद्रात टाकी क्रमांक तीनच्या ब्रिजच्या नूतनीकरणाचं काम चालू होतं. जुना ब्रिज हटविण्यासाठी मोठी क्रेन मागविण्यात आली होती. त्यावेळी क्रेन चालकाला कामगारांनी कोणताही ब्रिज उचलण्याचा इशारा दिलेला नसतानाही क्रेन चालकाने हलगर्जीपणाने ब्रीज उचलला.
त्याचा झटका लागून बबलू कनोजिया हा ३५, वर्षीय कामगार थेट ३० फूट खोल टाकीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हे काम विनायक इंजिनिअरिंग या पुण्याच्या ठेकेदार कंपनीमार्फत केलं जात असल्याची माहिती कामगारांनी दिली.
या कंपनीने कामगारांना कोणत्याही प्रकारचं सुरक्षा साहित्य पुरवलं नसल्याचं दिसून आलं. दरम्यानक्स बबलू हा त्याच्या घरचा एकमेव कमावता व्यक्ती असल्यानं त्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी इत कामगारांनी केली आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त असून पोलीस अधिक तपास करत आहेत.