महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान बनवण्याचे आमिष दाखवून फसवणूक; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना अटक
योगेश पांडे/वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान बनवण्याचे आमिष दाखवून तिघांनी चक्क बोगस भरतीचे आयोजन केले. पोलिस भरती प्रमाणे त्यांची मैदानी चाचणी देखील घेण्यात आली. पात्र उमेदवारांना पैशांची मागणी करताच या टोळीचा भांडाफोड झाला आणि त्यांची रवानगी थेट पोलीस ठाण्यात करण्यात आली. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा नाट्यमय घोटाळा उघडकीस आला.या प्रकरणीविशाल मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनी लाला बागाव या घोटाळेबाजांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व पंढरपूरचे राहणारे असून सिटी चौक पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर १७ डिसेंबरच्या सकाळी हुबेहूब पोलीस भरतीसाठी भरती आयोजित केली गेली. भल्या पहाटेच अनेक तरुण हजर झाले. सर्व उमेदवारांना एका रांगेमध्ये उभे करण्यात आले. लष्कराप्रमाणे शिस्त समजून सांगून भरतीची प्रक्रिया, पगार निकष सांगण्यात आले. कागदपत्रं गोळा करून सर्वांची मैदानी चाचणी घेतली. यातील ९२ जणांना आरोपींनी संपर्क करून २५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पुन्हा त्याच मैदानावर अंतिम प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले होते.
१७ डिसेंबर रोजी पोलिस भरती प्रमाणे हुबेहूब उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यात १२०० मीटर धावणे – २५ गुण, गोळा फेक – २५ गुण अशी रचना होती. २५ डिसेंबर रोजी येताना नियुक्त उमेदवारांनी ६ हजार रुपये घेऊन येण्याची सूचना करण्यात आली. परंतु बागुल आणि त्याच्या मित्रांना तेव्हाच संशय आला.
सदर भरती बाबत परवानगी व काही कागदपत्रांची मागणी केली आणि आणि आरोपींची बोबडी वळली. तोपर्यंत सर्वांनीच सहा हजार रुपये त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर केले होते. संतप्त उमेदवारांनी तिघांना पकडून सिटीचौक पोलीस ठाण्यात हजर केले. निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या आदेशावरून निरीक्षक दिलीप चंदन यांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. आरोपींनी पात्र उमेदवारांना कंत्राटी स्वरूपाची भरती सांगून ११ महिन्यांचा करार बंधनकारक असल्याचं सांगितलं. बारा हजार रुपये मासिक वेतन देण्याचे आश्वासन दिले. मात्र नियुक्ती व गणवेशासाठी ६ हजारांची मागणी केली. आरोपी विशालचा भाऊ लष्करात जवान आहे. सनीने सिव्हिल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. विशाल व विकास मात्र बारावी पास आहे. उमेदवारांचा विश्वास बसावा म्हणून ते नेहमी लष्कराच्या गणवेशात असायचे. मात्र काही तरुणांनी शंका उपस्थित केली आणि अनेक तरुण फसगतीपासून वाचले. आता हा तीनही आरोपी जेलची हवा खात आहेत.