नवी मुंबई पोलीस आणि मानवी तस्करी विरोधी पथकाकडून बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या ३ बांगलादेशी नागरिकांना अटक; एकाचा शोध सुरु
योगेश पांडे/वार्ताहर
ठाणे – भारताची सीमा अनेक देशांशी लागून आहे, यापैकी काही देश असे आहेत ज्यांच्याशी आपल्या जमिनीच्या सीमा लागून आहेत. अशा परिस्थितीत या देशांकडून घुसखोरीचा धोका नेहमीच असतो. यापैकी बांगलादेशला लागून असलेली आपली सीमा घुसखोरीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. हा धोका ओळखून भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी सीमेवर कुंपण घालण्याचे काम सुरू केले आहे, पण सपाट जमिनीसह भारत-बांगलादेश सीमा पर्वत, दुर्गम घनदाट जंगले आणि नद्यांमधूनही जाते. अशा स्थितीत या भागात कुंपण घालणे हे अत्यंत अवघड काम आहे. या अंतराचा फायदा घेत बांगलादेशी घुसखोर भारतात घुसतात आणि नंतर देशाच्या विविध भागात पसरतात. असाच एक प्रकार ठाणे जिल्ह्यात समोर आला आहे. पोलिसांनी ३ बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. नवी मुंबईत पोलीस आणि मानवी तस्करी विरोधी पथकाने बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या बांगलादेशातील ३ नागरिकांना अटक केली आहे. यापैकी दोन महिला आहेत. दरम्यान, आणखी एका बांगलादेशी घुसखोराचा शोध सुरू आहे. हे सर्व आरोपी नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती मिळताच धडक कारवाई सुरू करण्यात आली.
अमिरुल दिनो घरामी त्याची पत्नी रुखसाना आणि शकीला कादिर शेख अशी अटक करण्यात आलेल्या बेकायदेशीर बांगलादेशींची नावे आहेत. शकीलाचा पती कादिर शेख हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बेकायदेशीर बांगलादेशी प्रथम चुकीच्या मार्गाने भारतीय हद्दीत प्रवेश करतात, त्यानंतर त्यातील बहुतांश अवैध धंद्यात अडकतात. घुसखोर बांगलादेशी देखील सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन किंवा त्यांच्याशी संगनमत करून कागदपत्रे तयार करतात. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कादीर शेख आणि त्याची पत्नी शकीला कादिर शेख यांनी बेकायदेशीरपणे बनवलेले आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदार आय-कार्डही मिळाले होते. हे सर्व कार्ड बनवण्यात हे बेकायदेशीर बांगलादेशी कसे यशस्वी झाले, याचा शोध घेण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत. या बेकायदेशीर बांगलादेशींना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस आणि मानवी तस्करीविरोधी पथकाने त्यांची चौकशी सुरू केली. अधिकाऱ्यांनी जेव्हा या लोकांना त्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यास सांगितले तेव्हा ते कोणतेही कागदपत्र दाखवू शकले नाहीत. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी गुप्त माहितीच्या आधारे बेकायदेशीर बांगलादेशींच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले होते. या सर्वांविरुद्ध परदेशी कायदा, पासपोर्ट कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.