मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, पंढरीच्या वाटेला जाणारी बस व ट्रॅक्टरची धडक; पाच वारकरी जागीच ठार
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या बसचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला आहे.मंगळवारी रात्री उशिरा हा बस या मार्गावरुन जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरने बसला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. बसमध्ये ५४ भाविकांपैकी ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० भाविकांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून अन्य जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. एक्सप्रेसवेवर रात्री बसला ट्रॅक्टरने मागून धडक दिली. त्यामुळे बस दरीत कोसळली. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांवर मात्र काळाने घाला घातला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसला दरीतून काढण्यासाठी यंत्रणा कामाला लावली . तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री १ च्या सुमारास मुंबई पुणे भाविकांच्या बसला ट्रॅक्टरने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. बसमध्ये असलेल्या ५४ भाविकांपैकी ४२ भाविकांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले तर तीन रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर आहे आणि अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत. बसमधील सर्व प्रवासी डोंबिवली लोढा या परिसरातील असल्याचे समजते. भाविक काल रात्री बसने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघाले होते. पण वाटेतच आक्रीत घडले आणि भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी मुकले आहेत. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असताना सुद्धा ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आला आणि हा दुर्दैवी अपघात घडला. बंदी असताना सुद्धा ट्रॅक्टर आलाच कसा यावरुन पोलीस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.