महापालिकेच्या विटावा येथील शाळेतील मुख्याध्यापिकेची पालकांसोबत अरेरावी; थेट दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घेण्याच्या निर्देश
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे महापालिकेच्या विटावा येथील दिव्याक्षी शाळेतील व्हायरल व्हिडीओनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापिकेनं पालकांसोबत अरेरावी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘विद्यार्थी नववी पास झाले.मात्र दहावीमध्ये शिक्षण सुरु करण्यासाठी शाळेकडे पुरेशे विद्यार्थी नाही’असं म्हणत शाळा प्रशासनाने पालकांना धक्काच दिला.
दुसऱ्या शाळेत अडमिशन मिळवून देण्याच्या नावाखाली शाळा प्रशासनाकडून पालकांना हमीपत्र लिहिण्यासाठी सांगण्यात आलं.यावर एका पालकाने विचारलं की,याबाबत तु्म्ही कारण द्या.तुम्ही दुसऱ्या शाळेत विद्यार्थांना का पाठवता? आमच्याकडून लेखी निवेदन का घेता? त्यानंतर मुख्याध्यापिकेचा राग अनावर झाला आणि तिने पालकांसोबत हुज्जत घातली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीतील विटावा येथील दिव्याक्षी विद्यालय आहे. या विद्यालयात काव्या खेडेकर ही विद्यार्थीनी नववीची परीक्षा उत्तीर्ण होऊन दहावीच्या वर्गात गेली. मात्र शाळेत दहावीचा वर्ग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. काव्याचे मामा समीर गोसावी यांचं म्हणणं आहे की,शाळेत पालकांची बैठक होती.या बैठकीत मुख्याध्यापिकेनं सांगितलं की,’दहावीच्या वर्गासाठी पुरेसे विद्यार्थी नसल्याने आम्ही दहावीचा वर्गा चालवू शकत नाही.
आम्ही या विद्यार्थ्यांची सोय दुसऱ्या शाळेत करतो.त्यासाठी तुमचे हमी पत्र द्या.’त्यानंतर पालक समीर गोसावी यांनी विचारलं की, आम्ही लिहून का द्यायचं?तुम्ही का लिहून देत नाहीत? तुमची जी समस्या आहे ती तुम्ही लिहून द्या.त्यानंतर मुख्याध्यापिकेनं पालकांना धारेवर धरलं.दरम्यान,या शाळा व्यवस्थापनावर आणि मुख्याध्यापिकेवर काय कारवाई होणार?याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.