मुंबईच्या घाटकोपरमध्ये तांडव, विमान कळपाला धडकले, ३६ फ्लेमिंगोचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. फ्लेमिंगोच्या कळपाशी विमानाची टक्कर झाली. यामुळे एक-दोन नव्हे तर तब्बल ३६ फ्लेमिंगो पक्ष्यांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील घाटकोपर येथील लक्ष्मी नगर भागात पक्ष्यांच्या कळपाला धडकल्याने एमिरेट्सच्या विमानाचे नुकसान झाले.एकीकडे ३६ पक्षी मरण पावले, तर दुसरीकडे विमानाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे विमान तातडीने उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि केबिन क्रू सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. मुंबई विमानतळावरील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९.१८ वाजता एमिरेट्सचे फ्लाइट ईके ५०८ पक्ष्यांच्या कळपाशी आदळले. यानंतर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत शोध सुरू असताना सुमारे २९ फ्लेमिंगोचे मृतदेह सापडले, तर मंगळवारी सकाळी आणखी चार ते पाच मृतदेह सापडले. शेवटच्या वृत्तापर्यंत विमान कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हे स्थलांतरित पक्षी डिसेंबरच्या आसपास या किनाऱ्यांवर पोहोचतात आणि मार्च आणि एप्रिलपर्यंत दिसतात. अलीकडच्या काळात फ्लेमिंगोचा अधिवास धोक्यात आला आहे. याआधीही नवी मुंबईत फलकाला धडकून काही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.