मुंबईत भरारी पथकाच्या कार्यवाई; भांडुपमधील एका कारमधून साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका कारमधून साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ही रक्कम कोणाची आहे, रक्कम कुठे जात होती, यासंदर्भात तपास सुरु आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. या काळात रोकड रक्कम नेण्यावर निर्बंध आहेत. मात्र, तरी देखील अनेकांकडून आचारसंहितेचा भंग केला जात आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर शनिवारी नाकाबंदीदरम्यान निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका व्हॅनची तपासणी केली. यावेळी व्हॅनमध्ये तब्बल तीन ते साडेतीन कोटी रुपयांची रोकड आढळून आली. भरारी पथकाने रोकडसह व्हॅनचालकाला ताब्यात घेतलं आहे. इतकी मोठी रक्कम कुणाची आहे, ती कुठे नेली जात होती. याबाबत चौकशी सुरू आहे. सध्या रोकड रक्कम भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये आयकर विभागाचे पथक देखील तपास करत आहे.
पथकाने पकडलेल्या कॅशची मोजणी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेली गाडी एटीएमचे पैसे वाहतूक करण्याऱ्या गाडीसारखी आहे. भरारी पथकाने महाराष्ट्रात गेल्या ४४ दिवसांत ४० कोटींची रक्कम पकडल्याची माहिती आहे.