विजेचा शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू; दिंडोशी पोलिसांनी सोसायटीतील चार व्यक्तींना केली अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दिंडोशी गोकुळधाम परिसरातून काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. गोकुळधाम परिसरातील महाराजा रिट्रेट इमारतीत राहणाऱ्या १० वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आर्यवीर चौधरी असं मृत मुलाचं नाव आहे. शनिवारी तो आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेला होता. खेळता खेळता गार्डनमध्ये असलेल्या एका तारेवर त्याचा पाय पडला आणि त्याला विजेचा मोठा झटका बसला. याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजीनदार व केअरटेकर यांच्याविरूध्द दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता चौघांना अटक देखील केली आहे. रविंद्र नागुसिंग कंजारभाट, सुभाष गणपतराव शिंदे, अरूपकुमार निखिलचंद्र सोम आणि मोहम्मद छोटे युनूस कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यवीर हा १९ एप्रिलला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सोसायटीतील गार्डनमध्ये त्याच्या मित्रांसोबत खेळण्यासाठी गेला. त्या ठिकाणी लोखंडी पाईपवर फुटलेला पांढऱ्या रंगाचा अपलाईटर होता. वीजेचा पुरवठा करणाऱ्या वायरला जॉईंट करून ही वायर उघड्या अवस्थेत होती. खेळताना वायरला आर्यवीरचा स्पर्श झाला. यामुळे त्याला जोरदार विजेचा धक्का लागला आणि तो जागेवरच बेशुद्ध पडला. यानंतर त्याचे वडील आणि सोसायटीतील इतर नागरिकांनी त्याला ताबडतोब बेशुद्ध अवस्थेत उपचाराकरीता लाईफलाईन रुग्णालय, गोकुळधाम गोरेगाव, मुंबई येथे नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही घटना सोसायटीचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि केअरटेकर यांच्यामुळे झाल्याचा आरोप मृत मुलाच्या वडिलांनी केला. यामुळे याच चौघांविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिंडोशी पोलिसांनी घटनेचा तपास करून सोसायटीतील चार व्यक्तींना अटक देखील केली आहे.