१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचेच; १६ ऑगस्टनंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे आहे.१६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांना आता काही झालं तरी मराठी शिकावी लागणार आहे.
राज्यातील प्रवाशांशी संवाद साधताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला होता. तो म्हणजे मराठी भाषा ही प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी चालकाला यायलाच पाहीजे. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना मुदत ही देण्यात आली होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वांसाठी १५ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. या पुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही यावर आपण ठाम असल्याचं नाईक म्हणाले.
परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले की, या मोहिमेसाठी १५ ऑगस्ट ही अंतिम मुदत असेल. १६ ऑगस्टनंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. जे चालक या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर तीव्र कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि संवाद सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाकडून याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे १५ ऑगस्टनंतर काय होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.