महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी शिवसेना- भाजपात वाद; प्रकरण न्यायालयात जाणार
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर – उल्हासनगर महापालिकेत सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. निमित्त ठरले आहे ते म्हणजे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती. या नियुक्तीवरून दोन्ही पक्षांमधील तणाव इतका वाढला आहे की, आता हे प्रकरण थेट न्यायालयाच्या पायऱ्या चढण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेच्या महापौरांनी विरोधी पक्षनेता नियुक्ती करताना भाजपला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे युतीमध्येच यावरून ठिणगी पडल्याचे चित्र आहे.
नुकत्याच झालेल्या महासभेत महापौर अश्विनी निकम यांनी काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती जाहीर केली. या निर्णयामुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात आणि महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना, शिवसेनेने भाजपला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. शिवाय ही नियुक्त बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे ही नियुक्ती रद्द करण्याची त्यांनी मागणी आहे.
भाजपने या नियुक्तीला ‘बेकायदेशीर’ ठरवले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वघारिया यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत म्हटले आहे की, “महत्त्वाचे निर्णय घेताना मित्रपक्षाला डावलणे चुकीचे आहे.” या संदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींना सविस्तर अहवाल दिला आहे. शिवाय या नियुक्तीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता कोर्टात जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या वादामुळे महापालिकेतील सत्ताधारी युतीमध्ये समन्वयाचा किती मोठा अभाव आहे, हे स्पष्ट झाले आहे. या राजकीय संघर्षामुळे महापालिकेच्या आगामी प्रशासकीय कामकाजावर आणि धोरणात्मक निर्णयांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात आता “ऑल वेल” नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आगामी काळात हा वाद कोणते वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आपल्या भूमीकेवर ठाम आहे.