फडणवीसांना हटवण्यासाठी अघोरी विद्येचा घाट?

Spread the love

फडणवीसांना हटवण्यासाठी अघोरी विद्येचा घाट?

अशोक खरातकडे जाऊन ३८ आमदारांनी बोट कापलं;जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. अशोक खरात यानेही या संबंधित नेत्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करु, असे आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते बुधवारी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेवेळी बोलत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अशोक खरात आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांबाबत अनेक स्फोटक दावे केले.

अशोक खरात याला वाचवण्यासाठी २००७ साली पहिला बळी पत्रकार बाळू तुपे याचा देण्यात आला. त्यावेळी या प्रकरणाची नाशिकमध्ये प्रचंड चर्चा होती. वृत्तपत्रातही याबाबत लेख छापून आले होते. त्यामुळे अशोक खरात कोण हे पोलिसांना माहिती नव्हते, अशातला भाग नव्हता. या सगळ्या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घ्यायचे, त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतले, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, मी खात्रीने सांगतो, अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काहीजण प्रयत्न करत होते. हे सर्वजण अशोक खरातकडे पूजा घालायला गेले होते. वेळ आल्यावर मी त्यांचे नाव उघड करेन. ही सगळी माहिती सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. या नेत्यांच्या खरातसोबत बैठका झाल्या होत्या. तेव्हा अशोक खरात म्हणाला होता, ‘मला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील.’

अशाप्रकारच्या काळ्या जादूला आपण राज्यमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू, ईशान्येश्वर मंदिरासाठी कमानी बांधल्या, टाक्या बांधल्या, हा अशोक खरात इतका मोठा कोण होता? मला एका गोष्टीचे वाईट वाटतंय की, या तुकारामांच्या महाराष्ट्रात, ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण काळ्या जादूला इतकी मान्यता देतोय. राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते, असे समस्त आमदारांना वाटू लागले आहे. माझ्याकडे ३८ आमदारांची लिस्ट आहे, त्यांनी अशोक खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या होत्या. परवा विधानभवनात सगळे आमदार एकमेकांची बोटं तपासून पाहत होते, तू खरातकडे जाऊन आलास का, विचारत होते. ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे. या बाबासाठी सरकाराचा पैसा जातोय, रस्ते बनवले जात आहेत. शिक्षण खाते, म्हाडा, एसआरए सगळ्या पोस्टिंग खरातकडून केल्या जात आहेत. हे काय सुरु आहे? अशोक खरातच्या ट्रस्टच्या सदस्य असणाऱ्यांना अजून अटक का झाली नाही, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon