पिंपरीतील व्यापाऱ्याचे ५० लाखांसाठी अपहरण; १०० किमीचा पाठलाग करून ५ आरोपींना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड शहरातील एका व्यापाऱ्याचे ५० लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तब्बल १०० किलोमीटर पाठलाग करून आरोपीला बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने संगमनेर येथे तब्बल १०० किलोमीटर पाठलाग करून पाच आरोपींना अटक करत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे. ९ मार्च रोजी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास राहटणी येथील शिवराज नगर येथून हॉटेलच्या बाहेरून एका चार चाकी वाहनातून सुरेशकुमार बाबूमल जयस्वानी या ४७ वर्षीय व्यावसायिकाचा अपहरण करण्यात आलं होतं.
याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पाच अनोळखी व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत या पाचही जणांना ताब्यात घेतले आहे.
हे पाचही आरोपी मूळचे बिहारमधील असून अपहरण करण्याकरिता ते पिंपरी चिंचवड शहरात आले असल्याची माहिती समोर आली. या अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे.
दि.०९/०३/२०२६ रोजी १७.१५ वाजताच्या सुमारास शिवराजनगर येथील बंद अवस्थेतील फाऊंटन हॉटेलचे समोरील लेनमध्ये रहाटणी पुणे येथून सुरेशकुमार बाबुमल जैसवानी यांच्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कार नं. युपी. ७०.९२७२ मधून खंडणीकरीता जबरदस्तीने अपहरण करुन त्यानंतर भाऊ सुरेशकुमार याचेच मोबाईल नंबर xxx वरुन फोन करुन ५० लाख रुपयांची खंडणी मागणी करुन ५० लाख रुपये खंडणी दिली नाही तर सुरेशकुमार यास जीवे ठार मारू असे म्हणाले. स्विफ्ट कारमधील अनोळखी ५ इसमांविरुध्द कायदेशीर फिर्याद व्यापाऱ्याच्या भावाने दिली आहे.