आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतातील सामान्य जनतेला!
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या ११ दिवसांच्या भयंकर युद्धाची धग आता नागरिकांच्या घरापर्यंत येऊन पोहोचल्याचे चित्र आहे. आखाती देशांमध्ये युद्धाची आग धुमसत असल्याने येथून भारताला होणारा खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. पुढील काही दिवस युद्ध सुरु राहिल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर स्वरुप धारण करु शकते. राज्यासह देशभरात उद्भवलेल्या गॅस सिलिंडरच्या तुटवड्यावरून आता सरकारवरही विरोधकांकडून टीका केली जात आहे. अशातच गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारला दिला आहे.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतातील सामान्य जनतेलाही बसू लागली आहे. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मुंबई – पुणे सारख्या शहरांमध्ये गॅसच्या अभावी हॉटेल्स, खानावळी हळूहळू बंद होत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिली आहे.
या विषयी अधिक बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, मुंबई – पुणे आणि परिसरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. तसेच परिस्थिती आटोक्यात आली नाही तर घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात होईल. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून तोडगा काढावा, हवं तर केंद्राशी बोलून यावर तोडगा काढावा अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला.
गॅस तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल्समध्ये मेन्यू कार्ड बदलण्याची वेळ आलीय. जे पदार्थ एकाचवेळी शिजवून तयार करता येतात असे पदार्थच ग्राहकांना देता येण शक्य आहे, मात्र ऐनवेळी तयार करावे लागणारे पदार्थ देणं बंद केल्याचं हॉटेल्स व्यावसायिकांनी म्हटलंय. त्यामुळे ग्राहकांना इडली किंवा वडा मिळू शकतो पण डोसा मिळणार नाही. हे पदार्थ देखील पुढचे दोन दिवसच मिळू शकतील, गॅस पुरवठा पुर्ववत न झाल्यास पुण्यातील हॉटेल्स दोन ते तीन दिवसांत बंद पडतील असा इशारा पुणे होटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिलाय.