भटक्या कुत्र्याने घेतला आणखी एक बळी; कल्याणमध्ये ३० वर्षीय तरुणानंतर आता ७ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणमध्ये दोन दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबिजची लक्षण जाणवू लागल्यामुळे ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आता भटक्या कुत्र्याने चावलेल्या एका ७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आणखी एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात ही घटना घडली आहे. रस्त्यातून जाणाऱ्या लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्लाा केला होता. या हल्ल्यात दोन लहान मुलं जखमी झाली होती. या भटक्या कुत्र्यांनी दोन्ही लहान मुलांच्या शरिराचे अक्षरश: लचके तोडले होते. गंभीर जखमी अवस्थेत मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचारादरम्यान एका ७ वर्षीय खुशील वाघे या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मोहने गाळेगाव परिसरातील स्थानिक नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त आणि महापौरांची या प्रकरणी भेट घेतली. “कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रस्त्यांवर येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांवर कुत्रे हल्ले करत आहे. सोसायटीच्या परिसरात खेळणार लहान मुलांवर भटके कुत्रे हल्ले करत आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशी मागणी आयुक्त आणि महापौरांकडे केली आहे, अशी माहिती तेजश्री गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी कल्याण पूर्व भागामध्ये कुत्र्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आयश विश्वनाथ अमीन (३०) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. आयश अमीन हा कल्याण पूर्व परिसरात तिसगाव नाका परिसरात राहत होता. नाका परिसरात आयश कामा निमित्ताने गेला होता. त्यावेळी एका भटक्या कुत्र्याने आयशला जोराचा चावा घेतला. आयशच्या पायाचा लचका तोडला होता. भटका कुत्रा चावल्यामुळे आयशने तातडीने रुग्णालयात जाणे गरजेचं होतं. पण, नंतर त्रास होऊ लागल्यामुळे तो डॉक्टरांकडे गेला आणि एकच इंजेक्शन घेतलं. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील उपचार घेण्याचं टाळलं. त्यानंतर रेबिजची लक्षणं जाणवू लागली, होणाऱ्या त्रासातून आयशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.