शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच! केडीएमसीतील नगरसेवकांना आदेश; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितली रणनीती
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेवकांनीही रविवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय आणि सूचना नगरसेवकांना करण्यात आल्या आहेत. येथील महानगरपालिकेत मोठा घोडेबाजार होत असल्याची तक्रार नगरसेवकांनी पक्षप्रमुखांकडे केली. तसेच, केडीएमसी महापालिकेत शिवसेना ठाकरे गट विरोधी पक्षात बसेल, अशी माहिती आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली.
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप महायुतीचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली होती. येथे, भाजप महायुतीने वर्चस्व मिळवले असले तरी शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक ५३ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, त्यांना सत्तास्थापनेसाठी आणखी नगरसेवकांची गरज आहे. त्यातच, मनसेच्या ५ नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर, ठाकरेंचे ४ नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने आणखी गोंधळ निर्माण झाला होता. रविवारी शिवसेना युबीटीच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, येथील महापालिकेत घोडेबाजार पहायला मिळत असल्याची भावना यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केली. तसेच, विरोधी बाकावर बसण्याचा पक्षाचा निर्णय मान्य असल्याच नगरसेवकांनी स्पष्ट केलं. आम्ही ही संपूर्ण निवडणूक शिंदेसेना आणि भाजपा विरोधात लढलो. आमचे नगरसेवक ५-६ हजारांच्या फरकांनी निवडून आले आहेत. त्यामुळे, या दोन्ही पक्षांसोबत न जाता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आम्ही बसणार अहोत. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही विरोधी बाकावर बसायचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती या बैठकीनंतर वरुण सरदेसाई यांनी दिली.
मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. शिवसेना उबाठा पक्षाचे जे ४ नगरसेवक आमच्यासोबत होते त्यांनी अजून नोंदणी केली नाही. मात्र पुन्हा बैठक घेऊ आणि जर ते आले नाही तर कारवाई करू. कारण, त्यांनी आमच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. मग तुम्ही पुढील ५ वर्षात मतदारांना कसं सामोर जाणार आहात, असा सवालही सरदेसाई यांनी नॉट रिचेबल नगरसेवकांना विचारला आहे.