धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ईव्हीएमविरोधात घोषणाबाजी; ४ जणांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरत आहेत.राज्यात विधानसभा, नगरपालिका आणि आता महापालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्याने पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनचा मुद्दा उपस्थित करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी होत आहे.
राज्य निवडणूक आयुक्तांनी ईव्हीएम बाबत स्पष्टीकरण दिलं असताना, आता राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसून ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन ईव्हीएम हटाव देश बचाओ अशी घोषणाबाजी केल्याने चांगलाच गोंधळ उडाला.प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा राजश्री उंबरे पाटील यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला.
ईव्हीएमवर बंदी घालावी, सत्ताधारी ईव्हीएमचा वापर करुन निवडणूक जिंकत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी कार्यलयात गोंधळ घातला. तसेच, निवडणूक आयोग आमच्या तक्रारींची दखल घेत नाही, असेही त्यांनी म्हटलं.ईव्हीएम हटविण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू असून उपोषणकर्ते बाळराजे आवारे यांच्या समर्थनार्थ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांनी चांगलीच धावपळ झाली.