झोपलेल्या अल्पवयीन मुलींना घरातून पळवलं; तिघी बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कल्याणमध्ये मध्यरात्री एकाच घरातून ३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री घरातून अल्पवयीन मुली पळवल्याची माहिती समोर आली आहे. त्या मुलींची कुटुंबीय शाळेसह नातेवाईकांच्या घरी आणि परिसरातही चौकशी करत आहे. त्या मुलींच्या कुटुंबीयांनी कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा सध्या ते शोध घेत आहेत. या घटनेमुळे पुन्हा लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.
या घटनेचा गुन्हा खडकपाडा पोलिसांकडे नोंदविण्यात आला आहे. सोमवारी आणि मंगळवारच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घरातून मुलींना पळवल्याची माहिती आहे. पहाटे घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. लहान मुलं पळवण्याच्या टोळीमध्ये एकाच व्यक्तीचा हात आहे की, कोणती टोळी सक्रिय आहे. याचा सध्या खडकपाडा पोलीस शोध घेत आहेत. सध्या पोलिसांकडून परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलींना पळवल्याचा संशय कुटुंबाला आहे, या बद्दलची माहिती कुटुंबाने पोलिसांना दिली आहे. खडकपाडा पोलिसांकडून घटनेची कसून चौकशी केली जात असून कुटुंबालाही कोणत्या व्यक्तीवरं संशय आहे का? याबद्दल विचारण्यात आले होते. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. यासोबतच खडकपाडा पोलिसांनी नागरिकांना आपल्या पाल्यांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, मुलांना केव्हाही एकटं बाहेर न सोडण्याचे आवाहनही केले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खडकपाडा पोलीस, कोळसेवाडी पोलीसांसह इत्यादी परिसरातील पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. नागरिकांकडून पोलीसांना रात्रीचे गस्त घालण्याची देखील मागणी केली जात आहे.