व्याजाच्या वादातून मित्राच्याच घरात चोरी; तिघे अटकेत
उमरग्यात अनैतिक संबंधातून खून, १२ तासांत आरोपी जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
धाराशिव : व्याजाने दिलेल्या पैशांवरून निर्माण झालेल्या रागातून मित्राच्याच घरात चोरी केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरात उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तिघा मित्रांना अटक करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७९ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७०/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार स्वप्नील सतीष जेटीथोर, श्वेत सुनील चिलवंत आणि निखील किरण सोनवणे (सर्व रा. धाराशिव) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, फिर्यादी शुद्धोधन गायकवाड यांनी दिलेल्या उसनवारीवर जादा व्याज आकारले जात असल्याच्या रागातून संगनमत करून धाराशिव शहरातील कुरणेनगर येथील त्यांच्या घरात चोरी केली. आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून तपास धाराशिव शहर पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस हवालदार महबूब अरब व रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली.
दरम्यान, उमरगा शहर बायपासजवळील कोरेगाववाडी रस्त्यानजीक ३५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्र व दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली. शाहूराज महादू सूर्यवंशी (वय ३५) असे मृताचे नाव आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, उमरगा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत दोन आरोपींना अटक करून गुन्ह्याचा छडा लावला आहे.