कल्याणमध्ये तरुणाच्या आत्महत्येमागील मारहाणीचा धक्कादायक मुद्दा; अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – रेल्वेत मारहाण झाल्याने मानसिक तणावात आलेल्या १९ वर्षीय अर्णव खैरे या तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम १०८, ११५(२) अन्वये गुन्हा क्रमांक ८३३/२०२५ नोंद झाला आहे.
अकस्मात मृत्यू प्रकरण (ए.डी . क्रमांक १३१/२०२५) तपासात, मयत अर्णवचे वडील जितेंद्र खैरे (वय ४६, रा. तिसगाव नाका, कल्याण पूर्व) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी अर्णव हा कल्याणहून मुलुंड येथे कॉलेजला जात असताना लोकल ट्रेनमध्ये “मराठी बोलता येत नाही का?” या कारणावरून काही अज्ञात व्यक्तींनी त्याला मारहाण केली. या घटनेमुळे झालेल्या मानसिक त्रासातून अर्णवने आत्महत्या केली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
तक्रार प्राप्त होताच कोळसेवाडी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी तपासासाठी दोन स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. रेल्वे पोलीस दलाच्या मदतीने आरोपींचा शोध वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या संवेदनशील प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रेल्वेप्रवासात वाढती असहिष्णुता आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.