रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार मात्र उघड; मुंबई एसी लोकलच्या छतातून पाणी गळती मुळे महिला प्रवाशांनी छत्री उघडून केला प्रवास
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – शुक्रवारी सकाळी ठाण्यातून सीएसटी दिशेने निघालेल्या ९ वाजून ३० मिनीटांच्या लोकलमध्ये पावसाचे पाणी झीरपले. यामुळे महिला प्रवाशांनी छत्री उघडून प्रवास करावा लागला. काही महिलांनी डोक्यावर प्लास्टिक पिशवी अडकवून पावसापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. ठाणे परिसरात शुक्रवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे रेल्वे गाड्यांची दिरंगाई दिसून आली. तर दुसरीकडे एसी लोकलच्या गळक्या छतामुळे प्रवाशांना दुहेरी त्रासाचा सामना करावा लागला.
यासंदर्भात रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता आरगडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मध्य रेल्वेच्या यापूर्वीच्या नॉर्मल लोकलमध्येही गळक्या छताचा इतक्या मोठ्या प्रमाणात त्रास उद्भवल्याचे पाहण्यात आले नव्हते. परंतु एसी लोकल ही अत्यंत उच्च दर्जाची सेवा देणारी लोकल मात्र गळकी असेल तर त्याचा त्रास प्रवाशांना अधिक होतो.महागडे तिकीट घेऊन चांगल्या सुविधांसाठी प्रवासी एसी लोकलकडे वळत असले तरी पावसाळ्यातील ह्या त्रासामुळे प्रवाशांची कोंडी होत असल्याचे आरगडे यांचे म्हणणे आहे. भविष्यात सर्व लोकल बंद दरवाजा आणि एसी केल्या जातील असे सांगितले जात असल्यामुळे नव्या लोकलमध्ये अशी स्थिती उद्भवू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक काळजी घ्यावी.रेल्वेच्या निर्मिती होत असलेल्या ठिकाणी एसी रॅकची परिपूर्ण तपासणी करून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही याची खात्री करूनच लोकल प्रवाशांच्या सेवेत याव्यात, असे रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे.