उल्हासनगर – अंबरनाथ दरम्यान लोकलमधून पडून २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर – बदलापूर, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, उल्हासनगर या ठिकाणाहून मुंबईकडे नोकरीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे. ही संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढतेच आहे. या मार्गावरुन मुंबईकडे जाणारी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना या मार्गावर लोकल ट्रेन मात्र अतिशय कमी, मर्यादित आहेत. त्यामुळे मोठ्या गर्दीतून प्रवाशांना दररोज प्रवास करावा लागतो. याच गर्दीच्या प्रवासात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान एका २५ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला असून रोहित मगर असं मृत तरुणाचं नाव आहे. रोहित मगर उल्हासनगरच्या सम्राट अशोक नगरचा रहिवासी होता.
रोहित हा अंबरनाथहून उल्हासनगरला लोकलने प्रवास करत होता. कानसाई ते उल्हासनगर दरम्यान त्याचा अपघात झाला. लोकलमधून पडून झालेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात त्याचा मृतदेह नेण्यात आला. रोहितचा अपघात नेमका कसा झाला, याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, बदलापूर, कर्जत, खोपोली या मार्गावर ट्रेनची संख्या कमी असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरुन भयंकर गर्दीतून दररोज प्रवास करावा लागतो. या जीवघेण्या, गर्दीच्या प्रवासात आतापर्यंत अनेकांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. हाच जीवघेणा प्रवास रोहितच्या जीवावर बेतला आहे.