पवई येथून विक्रोळीच्या दिशेने निघालेल्या बेस्ट बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधामुळे प्रवाशांचा जीव वाचला
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबईत बेस्ट बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जेव्हीएलआरच्या गांधीनगर जंक्शनवर बेस्ट बसला भीषण आग लागली . चालकाच्या प्रसंगावधामुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बसला लागलेली आग विझवण्यात यश मिळवला.बसला आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने लगेच बस थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवलं. त्यामुळे दुर्घटना टळली. ही बस पवई येथून एलबीएस मार्गाने विक्रोळीच्या दिशेने निघाली होती. काही वेळापूर्वी बसला अचानक आग लागली. बसमधून धूर निघू लागला. बसमधून धूर निघत असल्याचं लक्षात येताच चालकाने तात्काळ बस थांबवली. त्यानंतर लगेच बसमधील प्रवाशांना गाडीतून खाली उतरवलं आणि बसपासून लांब सुरक्षित अंतरावर जाण्यास सांगितलं. त्यानंतर काहीच क्षणात या धुराचं रुपांतर आगीत झालं आणि बस पेटली. आगीच्या ज्वाळांनी बसला घेरलं, आकाशात धुराचे मोठे लोट पसरले.या घटनेत ही बस पूर्णपणे जळून खाक झाली.
सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने या बसमधील प्रवासी सुखरुप बचावले आहेत. पण या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. पण, या घटनेने रस्त्यावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. ही आग कशी लागली, आग लागण्याचं नेमकं कारण काय याबाबत सध्या कुठलीही माहिती मिळालेली नाही. पण, या घटनेमुळे बसमधील प्रवाशांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. ज्याप्रकारे ही बस जळाली, ते अत्यंत धक्कादायक होतं. जर, बेस्ट बस चालकाने वेळीत धूर पाहून प्रसंगावधान दाखवलं नसतं तर मोठी दुर्घटना होऊ शकली असती. पण, त्यांच्यामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला आहे.