ठाणे मनपातील टॅक्स चोरीचा मोठा घोटाळा समोर; पालिकेचा ४० ते ५० कोटींचा महसूल बुडाला
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे मनपातील कर चोरीचा मोठा घोटाळा समोर आला असून ४० ते ५० कोटी रुपयांच्या कराची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला आहे. शीळ डावले भागात हजारो गोडाऊन्सकडून दोन ते तीन वर्षे कोणतीच कर वसुली किंवा शासकीय महसूल वसूल केला जात नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
बाबाजी पाटील यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या आरोपानुसार, शीळ-डावले परिसरात हजारो गोडाऊन्स कार्यरत असून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या गोडाऊन्सकडून कोणत्याही प्रकारचा कर वसूल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पालिकेचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत असल्याचे त्यांनी सांगितले.
या गोडाऊन्सपैकी अनेक गोडाऊन्स अनधिकृत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. असे असतानाही संबंधित ठिकाणी पालिकेकडून पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा पुरवल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालिका सध्या प्रशासकीय राजवटीत असताना अशा प्रकारचा मोठा घोटाळा उघडकीस येणे ही गंभीर बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या गोडाऊन्समुळे पालिकेचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत बाबाजी पाटील यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. अनधिकृत गोडाऊन्सवर दंडात्मक कारवाई करून थकित कर वसूल करावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.