ठाण्यात ३ दिवस पाणीकपात; अधिकांश भागांना बसणार फटका
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा स्रोतांवर अवलंबून असलेल्या ठाणे शहरातील काही भागांमध्ये पाणी कपात लागू होणार आहे. मुंबई महापालिकेच्या पिसे, पांजरापूर येथील विद्युत केंद्रात वीज मीटर्स अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने, मुंबई महापालिकेने त्यांच्या पाणीपुरवठ्यात १०% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कपातीमुळे, ठाणे महापालिकेकडून मुंबई महापालिकेच्या स्रोतातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये मंगळवार, ०७ ऑक्टोबर ते गुरुवार, ०९ ऑक्टोबर, २०२५ या तीन दिवसांच्या काळात १०% पाणी कपात लागू असेल. ठाणे शहराला विविध स्रोतांतून पाणीपुरवठा होतो, त्यापैकी ८५ एमएलडी पाणी हे मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून मिळते. याच पाण्यावर अवलंबून असलेल्या खालील भागांमध्ये पाणी कपात होणार आहे.
नौपाडा, पाचपाखाडी,हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी,साईनाथ नगर,रामचंद्र नगर १, किसन नगर नं १, किसन नगर नं. २, शिवाजी नगर,पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर आंबेडकर नगर मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ,भटवाडी, इंदिरानगर,आनंद नगर,गांधी नगर आणि कोपरी कन्हैया नगर.
या पाणी कपातीच्या काळात नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.