दारुच्या नशेत सीआयएसएफ जवानाच्या भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; महिला जागीच ठार, रिक्षाचालकासह २ मुली जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दारूच्या नशेत गाडी चालवून एका निष्पाप महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सीआयएसएफ जवानाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईचा वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दारुच्या नशेत सीआयएसएफ जवानाच्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली या भीषण दुर्घटनेत रिक्षातील प्रवासी महिलेचा जागेवरच मृत्यू झाला असून रिक्षाचालक व मृत महिलेच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी अपघातातील स्कॉर्पिओ कार आणि रिक्षा ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, जवानाकडील स्कॉर्पिओ कारवरील नंबर पाहता ती कार उत्तर प्रदेशची असल्याचे दिसून येते. मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर सीआयएसएफ जवानाच्या गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात हाजरा इस्माईल शेख या ४८ वर्षीय महिलेचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रिक्षाचालक सोनू यादव आणि मृत महिलेच्या शाहीन इस्माईल शेख (२०) आणि शिरीन इस्माईल शेख (१७) या दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. रिक्षाचालकासह तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीन एप्रिलच्या मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली.
मालाडच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या सीआयएसएफ जवान धुंधराम यादव यांच्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. मात्र, सीआयएसएफ च्या गाडीतील जवानांनी दारू पिऊन राँग साईडने गाडी चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०५, १०६(१), २८१, १२५(अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन अधिनियम कलम १८४, १८५, १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला वनराई पोलिसांनी अटक केल्यानंतर मेडिकल केल्यावर आरोपी हा दारू पिऊन गाडी चालवत असल्याचं निष्पन्न झाला. आरोपीला अटक करून वनराई पोलिसांनी बोरिवली कोर्टात हजर केले असता बोरवली कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.