अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक! न्यायालयीन समितीचा धक्कादायक अहवाल आला समोर
पोलीस महानगर नेटवर्क
बदलापूर – बदलापूर येथील शाळेतील निष्पाप मुलींचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे. बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या कथित बनावट चकमकीचा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. आरोपी अक्षय शिंदेला घेऊन जाणाऱ्या पाच पोलिसांकडून वापरलेले बळ अनावश्यक होते आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाच पोलिस जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
“स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला हे पोलिसांच म्हणण पटणार नाही. हे संशयास्पद आहे” असं न्यायालयीन चौकशीच्या अहवालात म्हटलं आहे. कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली. “ही बनावट चकमक आहे असं आमच म्हणणं होतं. त्यासाठी गुन्हा दाखल करावा. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी आमची मागणी होती” असं अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या वतीने खटला लढणाऱ्या वकिलाने सांगितलं. “ही बनावट चकमक असून एकप्रकरची हत्या आहे हे मॅजिस्ट्रेटच्या अहवालातून समोर आलं आहे. आता पुढच्या कारवाईवर आमच लक्ष असेल” असं अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचे वकील अमित कटारनवरे म्हणाले. न्यायाधीश रेवती मोहिते आणि न्यायाधीश नीला गोखले यांनी मॅजिस्ट्रेटच्या अहवालाचा आढावा घेतला. पोलीस व्हॅनमध्ये असताना अक्षयने बंदूक खेचून घेतली. गोळीबार केला. त्यात एक पोलीस जखमी झाला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ आम्हाला गोळीबार करावा लागला असं पोलिसांच म्हणणं होतं.
जबाबदार पोलीस अधिकारी
संजय शिंदे (पोलीस निरीक्षक)
निलेश मोरे (उपनिरीक्षक)
हरिश तावडे (हवालदार)
अभिजीत मोरे (हवालदार)
बदलापूरची जनता रस्त्यावर उतरलेली
बदलापूच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे मुख्य आरोपी होता. या घटनेनंतर बदलापूरकराच्या मनातील आक्रोश, संताप समोर आला होता. बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली होती. अनेक तास रेल रोको आंदोलन करण्यात आलं होतं. मागच्यावर्षीची ऑगस्ट महिन्यातील ही घटना आहे. लोकांचा संताप लक्षात घेऊन कोर्टाने स्वत:हून याचिका दाखल करुन घेत काही पावल उचलली होती. आता राज्य सरकार कोणती कारवाई करणार हे पहावे लागेल.