नगरसेविकेकडून महिलेचे अपहरण; काँग्रेस नेत्यासह जावयावर भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील भांडुप परिसर या खळबळजनक घटनेमुळे चर्चेत आला आहे. भांडुपमधील प्रभाग क्रमांक ११० च्या काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर भांडुप पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा कोपरकर या मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आहेत. एका महिलेचे तिच्या राहत्या घरातून अपहरण करून तिला डांबून ठेवल्याचा आणि जबर मारहाण केल्याचा आरोप कोपरकर कुटुंबावर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे नगरसेविका आशा कोपरकर यांचे पती सुरेश कोपरकर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय कोपरकर कुटुंबीयांना होता. याच संशयातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयाचे भूत डोक्यात घेऊन नगरसेविका आणि त्यांच्या मुलांनी मिळून हा कट रचला.
आरोपींनी पीडित महिलेला तिच्या घरातून बळजबरीने उचलले आणि तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. तिथे नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई आणि मुलाने मिळून पीडितेवर प्रश्नांचा भडीमार करत तिला अमानुषपणे मारहाण केली. केवळ मारहाण करूनच हे कुटुंब थांबले नाही, तर या घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता केल्यास किंवा पोलिसांत गेल्यास जीवे मारण्याची गंभीर धमकीही त्यांनी महिलेला दिली. या संपूर्ण गुन्ह्यात कोपरकर कुटुंबाच्या खाजगी चालकानेही त्यांना मदत केल्याचा आरोप आहे.
पीडित महिलेने या भयानक प्रसंगातून सुटका झाल्यानंतर थेट भांडुप पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. महिलेच्या तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल घेत भांडुप पोलिसांनी माजी नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि त्यांचा चालक अशा सर्वांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार अपहरण, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, मारहाण करणे आणि धमकावणे या गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
भांडुप परिसरामध्ये सुरेश कोपरकर आणि आशा कोपरकर यांचे मोठे राजकीय वजन आहे. एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील सदस्यांवर थेट अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे काँग्रेस पक्षालाही स्थानिक पातळीवर रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.